लोकप्रिय पोस्ट

बुधवार, ८ जुलै, २०२०

कोरोना लसीला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त कशासाठी ?

कोरोना लसीला स्वातंत्र्यदिनाचा मुहूर्त कशासाठी ?

ब्लॉगर / अशोक सुतार 


करोनावरील लस उंबरठय़ावर आली असल्यास, ते वृत्त निश्चितच दिलासादायक. मात्र त्यासाठी विज्ञानाशी प्रतारणा करण्याचे काही कारण नाही. दि.१५ ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर करोना रोखणारी स्वदेशी लस निर्माण व्हायला हवी हा भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचा आग्रह समर्थनीय वाटत नाही. देशाची आघाडीची केंद्रीय विज्ञान संशोधन संस्थेने लसनिर्मितीसारख्या जोखमीच्या घटकाच्या निर्मितीचा मुहूर्त स्वातंत्र्यदिनी काढण्यासाठी केंद्र सरकारचा दबाव आहे काय, असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.  

                                                   

केंद्र सरकारला कोरोनाची प्रतिकूल परिस्थिती कमी करता आलेली नाही. कोव्हीड-१९ साठी लस दि. १५ ऑगस्टपर्यंत तयार होईल, हा भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेचा ( आयसीएमआर) दावा अवास्तव आहे. लॉकडाऊनचा गोंधळ, कोलमडलेली अर्थव्यवस्था या पार्श्वभूमीवर मोदींना लाल किल्ल्यावरून एखादी मोठी घोषणा करता यावी, यासाठी हा आटापिटा आहे काय ? खरे तर कोरोना लस, त्याची मानवी चाचणी आणि तीन टप्पे यांसाठी किमान ४ महिने लागतात. परंतु स्वातंत्र्यदिनीच कोरोनाच्या लसीचा मुहूर्त आणि तोही वैज्ञानिक नियम न पाळता करणे कितपत योग्य आहे ? याचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने देणे गरजेचे आहे.                          आयसीएमआरने १५ ऑगस्टपर्यंत कोरोनावर लस तयार होईल असे म्हणणे म्हणजे राजकारण्यांच्या आश्वासानासारखे आहे. कोरोनाची लस शोधली असेल तर किमान तीन टप्पे पूर्ण करून त्याची चाचणी अनेकवेळा झाली पाहिजे, ती चाचणी सिद्ध झाली पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे यासाठी अजून किमान चार महिने जावे लागतील. कोविड १९ वर भारतात निर्माण केलेली लस स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर जारी करण्याच्या सरकारच्या खटाटोपावर देशातील वैज्ञानिकांनी धोक्याचा इशारा दिला आहे. आयसीएमआरने 15 ऑगस्टपर्यंत करोनावरची स्वदेशी लस स्वातंत्र्य दिनापर्यंत तयार झालीच पाहिजे, असे फर्मान संबंधित औषध कंपन्या, रुग्णालये व वैज्ञानिक संस्था यांना सोडल्याने त्यावर सर्व थरातून टीका होत आहे. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल एथिक्सचे संपादक अमर जेसानी म्हटले आहे की, लसीचा पहिला आणि दुसरा टप्पा एकत्रितरित्या करण्यात येणार असून तोही इतक्या कमी वेळात राबविण्याची सूचना वैज्ञानिकदृष्टय़ा अतार्किक आहे. वैद्यकीय चाचण्यांचा तिसरा टप्पा महत्वाचा असून यात मोठय़ा संख्येने दोन गटामध्ये या लसीच्या परिणामकता तपासली जाते. यात एका गटाला लस दिली जाते आणि दुसऱ्या गटाला न देता यामधील बदल नोंदविले जातात. याला किमान तीन ते चार महिन्याचा कालावधी लागतो. त्यानंतरच लस सार्वजनिकरित्या उपलब्ध केली जाते. परंतु आयसीएमआरच्या निर्णयामध्ये हा तिसरा टप्पा पूर्णपणे वगळून थेट लस उपलब्ध करण्याचे आदेश आहेत. लसनिर्मिती हे वैज्ञानिक संशोधन असून राजकीय धोरणामुळे यातील काही टप्पे वगळले किंवा अतिघाई केल्यास हे संशोधन अपयशी होण्याची शक्यता आहे. दि.१५ ऑगस्ट या लसीच्या मुदतीचा विचार केला तर कंपन्यांकडे चाचण्यांसाठी एक महिनाच बाकी आहे. इतक्या कमी वेळात सर्व आवश्यक प्रक्रिया पूर्ण होतील याचे पुरावे कोण देणार ? यातील सुरक्षा व औषध विकास तसेच इतर टप्प्यांचे काय, वैद्यकपूर्व अभ्यास पूर्ण करण्यात आला आहे का, त्यामुळे जर जास्त घाई केली जात असेल तर त्यात जोखीम आहे यात शंका नाही. लसीमुळे किती प्रमाणात प्रतिपिंड तयार होतात याची चाचणी महत्त्वाची असते. त्यालाच महिना ते दोन महिने लागतात. नंतर लसीच्या सुरक्षा चाचण्या करून मग मानवी चाचण्यांना लस सिद्ध होते.                                  आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव याबाबत काहीही बोलत नाहीत, हे आक्षेपार्ह आहे. कोरोना किंवा नव्या उद्भवलेल्या महामारीची लस उपलब्ध होण्यासाठी दीर्घ काळ लागतो. त्यावर संशोधन, शास्त्रीय चिकित्सा, त्या लसीचे किमान तीन टप्पे, शास्त्रीय पद्धत इ. गोष्टी चार –पाच महिने सुरु असतात. शास्त्रीय पद्धतीने लस प्रत्यक्षात बाजारात येण्यासाठी अजून किमान ७ महिने लागण्याची शक्यता आहे. भारतात फेब्रुवारी – मार्च २०२० दरम्यान करोनाची महामारी आली आहे. या पार्श्वभूमीवर करोनावर लस बनवायची म्हटले तर किमान १५० जणांवर (त्यापूर्वी त्याचे शास्त्रीय विवेचन, घटक, पद्धत इ. माहिती ) चाचणी करणे गरजेचे असते. स्वातंत्र्यदिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशवासियांना संबोधताना, कोरोना लस शोधल्याचे ऐतिहासिक आश्वासन देण्याची देण्याची शक्यता नाकारता येत नाही. मोदी यांनी देशवासियांना दिलेले आश्वासन नेहमीच ऐतिहासिक किंवा यापूर्वी कोणत्याही सरकारने केलेले नसते, ते अभूतपूर्व असते, असे देशवासियांना दाखवले जाते. त्यासाठी नेमका इव्हेंट केव्हा शोधायचा, हे देखील ठरलेले असते. धन्य ते सत्ताधारी आणि धन्य तो देश, असे जगातील सर्व देशांनी म्हटले पाहिजे, याचा आटापिटा केंद्र सरकार करत असल्याचे नेहमी दिसते.

 

 


शुक्रवार, २६ जून, २०२०

भारत-चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका

भारत-चीन संघर्ष : अमेरिकेची भूमिका 

अशोक सुतार / ८६००३१६७९८  


भारत आणि चीन या शेजारी असलेल्या देशांत सध्या सिमाप्रश्नावरून तणाव सुरु आहे. दोन्ही देशांतील सैन्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात चर्चा सुरु आहे. परंतु चीनने, सीमेवरील काही भूभागांवर दावा केला असून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावर मौन बाळगून आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी पत्रकार परिषदेत म्हटले होते, चीनने भारताच्या हद्दीत घुसखोरी केली नव्हती. यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताबद्दल गैरसमजूत होऊ शकते. असो. भारत आणि चीनमधील संघर्ष ४५ वर्षानंतर वाढला याला काही गोष्टी कारणीभूत आहेत. त्यातील एक गोष्ट म्हणजे भारताचे अमेरिकाधार्जिणे धोरण होय. या धोरणामुळे अमेरिका भारताचा सध्या मित्र असला तरी शेजारी चीनशी आपण शत्रुत्व घेतले आहे, हे नाकारून चालणार नाही. भारत – चीन संघर्षात अमेरिका भाग घेणार हे नक्की आहे. अमेरिकेने आता चीनच्या आजूबाजूला असलेल्या आपल्या लष्करी तळांना सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. खरे तर अमेरिका आणि चीन यांच्यात आर्थिक बाबींवरून मोठा संघर्ष सुरु आहे. यात भारत अमेरिकेची बाजू घेत असल्याचे पाहून चीनने सीमेवर घुसखोरी केल्याचे दिसते. सीमेवर कुरापती काढून भारताची अर्थव्यवस्था जर्जर करणे हे चीनचे उद्दिष्ट दिसत आहे. चीनमधून प्रसारित झालेल्या कोरोनामुळे सध्या जगाची अर्थव्यवस्था बिकट केली आहे. हे चीनचे षडयंत्र आहे, असे अमेरिकेसहित भारताचे व अन्य देशांचे म्हणे आहे. अमेरिका आणि चीन यांच्यात सुरू असलेला वाद भवितव्यात गंभीर रूप धरण करण्याची चिन्हे आहेत. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी आशिया खंडात अमेरिकन सैन्याची तैनाती वाढवण्याचे संकेत दिले असून, भारत आणि मित्र देशांना चीनपासून असलेला धोका विचारात घेऊन सैनिकांच्या तैनातीची समीक्षा करत असल्याचे पॉम्पियो यांनी म्हटले आहे. तसेच गरज पडल्यास अमेरिकन सैन्य चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा मुकाबला करण्यास तयार आहे, असा इशारा पॉम्पियो यांनी दिला आहे. मात्र आशिया खंडामध्ये चीनविरोधात सैनिक आघाडी मजबूत करण्यामागे अमेरिकेचे काही सुप्त हेतू आहेत, हेसुद्धा विसरून चालणार नाही. चीनची आर्थिक ताकद व विस्तारवादाला आळा घालणे, चीनवर दहशत बसवणे यामुळे अमेरिकेचे पारडे जड होणार आहे. अशा अनेक गोष्टी त्यामागे आहेत.                                               चीनला शह देण्यासाठी अमेरिकेने यापूर्वी तैवानजवळ तीन न्यूक्लियर एअरक्राफ्ट कॅरियर तैनात केले होते. पैकी दोन तैवान आणि उर्वरित मित्र देशांसोबत युद्धसराव करत आहे. तर तिसरे एअरक्राफ्ट कॅरियर जपानजवळ गस्त घालत आहे. सद्यस्थितीत अमेरिकेकडे जगातील सर्वात आधुनिक सेना आणि हत्यारे आहेत. ग्लोबल फायर प़ॉवर इंडेक्सनुसार, १३७ देशांच्या सूचीमध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचा विचार केल्यास अमेरिका इतर देशांपेक्षा खूप पुढे आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार, अमेरिकेचे जगभरात ८०० लष्करी तळ आहेत. त्यामधील  १०० तळ आखाती देशांमध्ये आहेत. तिथे सुमारे ६० ते ७० हजार जवान तैनात आहेत. आशिया खंडात चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे भारताला सर्वाधिक धोका निर्माण झाला असताना भारताचा मित्र अमेरिका भारताच्या बाजूने उभा राहिला आहे. सध्या लडाखमध्ये निर्माण झालेला वाद हे चीनच्या घुसखोरीचे मोठे उदाहरण असून भारताचे पंतप्रधान म्हणत आहेत की, चीनने घुसखोरी केलीच नाही, याचे आश्चर्य वाटते. चीनचे शेजारी देशांशी चांगले संबंध नाहीत. पूर्व चीन समुद्रातील बेटांवरून चीन आणि जपानमध्ये तणाव आहे. तैवानसोबतही चीनचा वाद आहे. तर फिलिपिन्स, मलेशिया आणि इंडोनेशियासोबतही चीनचा विवाद आहे. फेडरेशन ऑफ अमेरिकन सायंटिस्ट्स, इंटरनॅशनल क्रायसिस ग्रुपच्या आकडेवारीनुसार, अमेरिकेने चीनचे वर्चस्व कमी करण्यासाठी संपूर्ण आशियामध्ये चीनच्या चहुबाजूला दोन लाखांहून अधिक अमेरिकन सैनिक तैनात केले आहेत.        चीनच्या बाजूला लगत मालदीवपासून जवळ असलेल्या दिएगो गार्सिया येथे अमेरिका आणि ब्रिटिश नौदलाचा तळ आहे. हिंदी महासागरातील या महत्त्वपूर्ण तळावरून हिंदी महासागर आणि चीनच्या हालचालींवर नजर ठेवली जाते. जपानमध्ये दुसऱ्या महायुद्धाच्या काळापासून अमेरिकन सैन्याची उपस्थिती आहे. येथे अमेरिकेच्या नौदल, हवाई दल आणि लष्कराचे दहा तळ आहेत. एका करारानुसार जपानच्या संरक्षणाची जबाबदारी अमेरिकेने स्वीकारलेली आहे. इथून अमेरिका दक्षिण चीन समुद्रावर नजर ठेवते. पॅसिफिक महासागरातील गुआम या बेटावर येथे अमेरिकेचा लष्करी तळ आहे. इथून अमेरिका चीन आणि उत्तर कोरियाच्या हालचालींवर नजर ठेवते. तसेच त्यांना प्रत्युत्तर देण्याचे आणि नेव्हल ब्लॉकेज लावण्याचे काम करू शकते. उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये वाद आहे. त्या पार्श्वभूमीवर दक्षिण कोरियाच्या रक्षणासाठी इथे अमेरिकन फौज तैनात आहे. अमेरिकन संरक्षण मंत्रालयाच्या माहितीनुसार येथे अमेरिकेचे २८ हजार ५०० सैनिका तैनात आहेत. चीनच्या नजिक असलेल्या फिलिपिन्समध्येही अमेरिकन सैन्याचा तळ आहे. तैवानमध्ये अमेरिकेचा कुठलाही सैनिकी तळ नाही. मात्र येथे अमेरिकन सैन्य दलाची ये-जा सुरू असते. अमेरिकेच्या विमानवाहू नौका तैवानमध्ये तैनात आहेत. चीनकडून तैवानला असलेला धोका लक्षात घेऊन अमेरिकेने या या भागात आपली उपस्थिती वाढवण्यास सुरुवात केली आहे. वर्ल्ड ट्रेड सेंटरवर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानमध्ये तैनात आहे. सध्या अमेरिकेचे १४ हजार सैनिक इथे आहेत. तर मित्र देशांचे ८ हजार सैनिक उपस्थित आहेत. याशिवाय सिंगापूर, एसेसन बेटे आणि कझाकिस्तान येथेही अमेरिकेचे सैन्य तैनात आहे.                                                                   अमेरिकेसमोर चीनने आव्हान उभे केले आहे. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे अमेरिकेच्या मित्र देशांसमोर संकट निर्माण झाले आहे. या भागातील वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी अमेरिका प्रयत्नशिल असल्याचे दिसत आहे. लडाखमधील प्रत्यक्ष सीमा रेषेवर तणाव वाढत आहे तर दुसरीकडे चीनने आता दक्षिण चीन सागरातही दादागिरी करण्यास सुरुवात केली आहे. भारताने सीमेवर चीनच्या धूर्त चाली उधळून लावल्या. त्यात भारताचे २० जवान शहीद झाले. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माइक पॉम्पियो यांनी चीनला उद्देशून म्हटले आहे की,कीकडे भारत योग्यरीतीने राहत असून दुसरीकडे चीन दक्षिण चीन सागराचे सैनिकीकरण करत आहे आणि अवैधरित्या तेथील भागांवर दावा सांगताना दिसत आहे. यामुळे समुद्री मार्गांना धोका निर्माण झाला आहे आणि चीनने पुन्हा एकदा वचन भंग केला आहे.  ज्या दक्षिण चीन सागरात चीन दादागिरी दाखवत आला आहे, आता त्याला तेथेच घेरण्यासाठी भारत-ऑस्ट्रेलिया-अमेरिका आणि जपान यांनी चक्रव्यूह तयार केले आहे. रणनीतीच्या दृष्टीने, दक्षिण चीन समुद्र हा भारताच्या व्यापाराचा पारंपरिक मार्ग आहे. परंतु चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे भारताची कोंडी होत आहे. चीनने तैवान, व्हिएतनामच्या नियंत्रणाखाली असलेल्या बेटांचाही जबरदस्तीने ताबा घेण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. कोणत्याही परिस्थितीत भारताच्या पाठीशी उभे राहू, असे अमेरिकेने म्हटले आहे. तर राजनाथ सिंह शियासोबत मैत्रीचा नवा धागा निर्माण करत आहेत. चीनसोबत सध्या पाकिस्तान,उत्तर कोरिया हे दोन देश आहेत. अमेरिकेचे माईक पॉम्पिओ यांनी म्हटले आहे की, चीनकडून भारत आणि दक्षिण-पूर्व आशियाला धोका असून अमेरिकेने युरोपातून आपले सैन्य कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा सामना करण्यासाठी आम्ही सुसज्ज आहोत. एकंदर, भारताला चीनपासून धोका झाला तर अमेरिका आणि मित्र राष्ट्रे मदतीला येणार आहेत. सर्वांचे एकच ध्येय आहे, चीनची लष्करी दादागिरी मोडून काढणे हे होय. 

 


सोमवार, २२ जून, २०२०

चीनशी लढा देण्यास आपण आत्मनिर्भर आहोत ?

चीनशी लढा देण्यास आपण आत्मनिर्भर आहोत ?

अशोक सुतार / ८६००३१६७९८

कॅप्शन जोडा

ब्लॉगर / अशोक सुतार 

मुळातच केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण कचखाऊ आहे. परराष्ट्रमंत्र्यांऐवजी प्रधानमंत्रीच सर्व देशांशी संपर्क साधतात, असे चित्र निर्माण होत आहे. परराष्ट्रमंत्री गौण ठरत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील सुसंवादाचे मार्ग बऱ्यापैकी बंद झालेले दिसतात. दुसरी बाब म्हणजे, चीनमधील महत्वाचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, भारतातील काही तज्ज्ञ भारत सरकारला चीनच्या विरोधात वागण्याचा सल्ला देत आहेत. परंतु चीनशी विरोधाची भमिका घेणे भारताला परवडणारे नाही. यावरून असे दिसते की, चीनला भारताचे अमेरिकाधार्जिणे धोरण व भारताचे युरोपियन देशांना चीनविरोधात सहकार्य करण्याचे धोरण चीनला पसंत नाही.                             

लडाखमधील गलवान खोऱ्यात चीनची घुसखोरी आणि नंतरच्या संघर्षांत २० जवानांचे हौतात्म्य, आणखी दीडशे जवान गंभीर हे घडल्यानंतर भारतात सत्ताधारी आणि समर्थकांची प्रतिक्रिया ही की, चीनने घुसखोरी केलीच नाही. तसेच नागरिकांची प्रतिक्रिया ही की, चीनच्या वस्तुमालांवर बहिष्कार टाका. या दोन प्रतिक्रिया भिन्न मानसिकतेच्या आहेत. प्रधानमंत्र्यांच्या मते, जर घुसखोरी झालीच नव्हती, तर पुढील संघर्ष कसा काय होऊ शकतो ? सत्ताधारी आपली आबरू वाचवत असल्याचे या प्रतिक्रियेत दिसते, त्यापायी ते खोटे बोलण्यास कचरत नाहीत. सत्ताधाऱ्यांनी सत्य म्हटले आहे असे जर गृहीत धरले तर भारताने चीनच्या प्रदेशात घुसखोरी केली होती काय, असाही एक प्रश्न उद्भवतो. त्याबद्दल चीन आंतरराष्ट्रीय न्यायलयात दाद मागू शकतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी सत्य तेच कथन करावे, अन्यथा ते भारताच्या प्रतिमेला तडा जाऊ देण्यास मदत करत आहेत, असाच यातून निष्कर्ष निघतो. मुळातच केंद्र सरकारचे परराष्ट्र धोरण कचखाऊ आहे. परराष्ट्रमंत्र्यांऐवजी प्रधानमंत्रीच सर्व देशांशी संपर्क साधतात, असे चित्र निर्माण होत आहे. परराष्ट्रमंत्री गौण ठरत आहेत. त्यामुळे दोन्ही देशांतील सुसंवादाचे मार्ग बऱ्यापैकी बंद झालेले दिसतात. दुसरी बाब म्हणजे, चीनमधील महत्वाचे वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने म्हटले आहे की, भारतातील काही तज्ज्ञ भारत सरकारला चीनच्या विरोधात वागण्याचा सल्ला देत आहेत. परंतु चीनशी विरोधाची भमिका घेणे भारताला परवडणारे नाही. यावरून असे दिसते की, चीनला भारताचे अमेरिकाधार्जिणे धोरण व भारताचे युरोपियन देशांना चीनविरोधात सहकार्य करण्याचे धोरण चीनला पसंत नाही.                                                     कोरोना पसरवल्याचा आरोप अमेरिकेसारखे देश चीनवर करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर चीनला वेगळे पाडून चीनची आर्थिक ताकद कमी करण्याचा अमेरिका, फ्रांन्स इ. देशांचा विचार आहे. चीनविरोधात सुरु असलेल्या षडयंत्रात भारत सामील असल्याची शंका चीनला येत असावी. कारण हॉंगकॉंग, तैवानमध्ये लोकशाही स्थापित करण्याचा प्रयत्न अमेरिका आणि युरोपियन देश करत आहेत. भारताचा याला पाठिंबा आहे. तसेच हॉंगकॉंग, तैवान आणि भारताला जी सेव्हन परिषदेमध्ये सामील करून जी इलेव्हन बनविण्याचा अमेरिकेचा प्रयत्न सुरु आहे. चीनला याचा राग येणे स्वाभाविकच आहे. दुसरी बाब म्हणजे भारताने अजून आपली आर्थिक ताकद प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या कार्यकाळात सिद्ध केलेली नाही, किंबहुना भारताची आर्थिक घसरगुंडी सुरु असतानाच कोरोनाने त्यावर कडी केली. भारताची आर्थिक ताकद चीनला चांगलीच माहित झाली आहे. दुसरी बाब, भारतातील नागरिकांनी कितीही म्हटले तरी चीनच्या वस्तू-मालांवर बहिष्कार टाकण्यासाठी केंद्र सरकार परवानगी देणार नाही. कारण जागतिक व्यापार संघटनेशी भारताने १९९१ साली मुक्त व्यापार करार केला आहे. चीनच्या मालावर कुणीही बहिष्कार टाकला तरी चीनची निर्यात कुणीही रोखू शकणार नाही. त्यामुळे शहाणपणा यातच आहे की, भारत सरकारने उद्योगस्नेही धोर, पारदर्शक कररचनेचा विचार करून देशात जास्तीत जास्त उद्योगधंदे आणून भारताचे उत्पादन सर्वदूर पोहोचवणे आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारणे.            अमेरिकेसारखे देश आपल्या शत्रूविरोधात भारताचा वापर करून घेत आहेत काय, याचाही केंद्र सरकारने विचार करावा. जागतिक महासत्तेशी मैत्री केली याचा अर्थ आपण जागतिक महासत्तेच्या वाटेवर आहे, असे नाही, हा फार तर भ्रम असू शकतो. त्यासाठी आपली आर्थिक ताकद निर्माण करणे, स्पष्ट आर्थिक धोरणे ठरवणे, रोजगार, व्यापार, संरक्षणदृष्ट्या देशाला समृद्ध करणे गरजेचे आहे. अमुक वर्षानंतर देश महासत्ता होणार, अशा वल्गना करण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांनी चीनशी संघर्ष का होत आहे, चीनने भवितव्यात आक्रमक पावले उचलली तर त्याला उत्तर देण्याएवढे तगडे आव्हान भारताने आत्मनिर्भरतेने द्यावे. अन्यथा, कोणीही येऊन भारताला आव्हान देऊन जाईल आणि आपण फक्त स्वस्थ बघत राहू.


रविवार, २१ जून, २०२०

ऑनलाईन शिक्षण : दूरदर्शन व आकाशवाणीचा पर्याय

ऑनलाईन शिक्षण दूरदर्शन व आकाशवाणीचा पर्याय दूरदर्शन व आकाशवाणी ही केंद्र सरकारची प्रसारमाध्यमे राजकीय कामासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून वापरली जात असल्याचा आरोप अनेकवेळा झाला आहे. तर शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी कोरोनाकाळात व लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्याना दूरदर्शन व आकाशवाणीवर ऑनलाईन शिक्षण का मिळू शकत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. केंद्र सरकारने यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण द्यावे, असा आदेश केंद्र सरकारने दिला आहे. परंतु ते कसे व कोणत्या परिस्थितीत द्यावे आणि केंद्र सरकार त्यासाठी काही सहकार्य करणार का, याबात काहीही माहिती दिलेली नाही. फक्त आदेश देऊन चालत नाही तर प्रत्यक्ष कार्यवाही कशी करायची याचा आराखडा केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाकडे उपलब्ध हवा. काही तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना लॉकडाऊनच्या काळात ऑनलाईन शिक्षण द्यावे, असा फतवा काढला आहे. परंतु शहरी भागात जेमतेम ४२ टक्के लोक संगणक आणि स्मार्ट फोनचा वापर करतात तर ग्रामीण भागात हे प्रमाण १७ टक्के आहे. असे असताना ऑनलाईन शिक्षण सर्व विद्यार्थ्यांना आर्थिक परिस्थितीप्रमाणे घरी घेणे परवडणारे नाही. ऑनलाईन शिक्षणाची दुसरी माध्यमे कोणती, याबाबत विचार केला तर सरकारी प्रसारमाध्यमांचा वापर करणे हितावह आहे, असे दिसून येते. दूरदर्शन आणि आकाशवाणी या सरकारी प्रसारमाध्यमांतर्फे ऑनलाईन शिक्षण देण्याचा मार्ग उपलब्ध आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केंद्र सरकार व प्रसारण मंत्रालयाला विनंती केली होती की,दूरदर्शन आणि आकाशवाणी यांचा शैक्षणिक कामकाजासाठी वापर करण्याच्या दृष्टीने त्यांचा वेळ निश्चित करून द्यावा. विद्यार्थ्यांना त्यामुळे ऑनलाईन शिक्षण घरबसल्या घेता येणे शक्य आहे. परंतु ना. वर्षा गायकवाड यांच्या मागणीला केंद्र शासनाच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून अद्याप प्रतिसाद देण्यात आलेला नाही. परिणामी दूरचित्रवाणी आणि रेडिओचा वापर करून स्मार्टफोन, संगणक नसलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यात अडचण निर्माण झाली आहे. केंद्र सरकारची ही प्रसारमाध्यमे राजकीय कामासाठी केंद्रीय मंत्र्यांकडून वापरली जात असल्याचा आरोप अनेकवेळा झाला आहे. तर शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी कोरोनाकाळात व लॉकडाऊनमध्ये विद्यार्थ्याना दूरदर्शन व आकाशवाणीवर ऑनलाईन शिक्षण का मिळू शकत नाही, हा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. केंद्र सरकारने यावर गंभीरपणे विचार करणे गरजेचे आहे. दरवर्षी नवीन शैक्षणिक वर्ष जून महिन्यात सुरु होते. यावेळी देशात व जगभर कोरोना महामारीचा संसर्ग पसरल्यामुळे गेले तीन महिने लॉकडाऊन सुरु आहे, काही ठिकाणी संचारबंदी असून लोकांना बाहेर फिरण्यास ठराविक वेळ देण्यात आला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी लोकांनी गर्दी न करण्याचे आवाहन सरकारतर्फे करण्यात आले आहे. सर्व ठिकाणी सॅनिटायझर व मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे. शाळा, महाविद्यालयांत होणारी विद्यार्थ्यांची गर्दी पाहता तिथे सोशल डिस्टन्सिंग पाळले जाणार नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना कोरोना संसर्गाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे मागील वर्षाच्या अनेक परीक्षा रद्द केल्या. आता नवीन शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना शिक्षण द्यावे तर कसे, असा प्रश्न सरकारपुढे आहे. शिक्षण आवश्यक आहे, परंतु त्यापेक्षा विद्यार्थ्यांचा जीव लाखमोलाचा आहे. त्यामुळे काही तज्ज्ञांनी ऑनलाईन शिक्षणाची कल्पना पुढे आणली. मोदी सरकार २०१४ मध्ये सत्तेवर आले आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीतही पुन्हा दुसरी टर्म ते सत्तेवर आले आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच डिजिटल भारताची घोषणा केली होती. ज्याप्रमाणे वाजपेयी सरकारच्या कार्यकाळात शायनिंग इंडिया ही घोषणा करण्यात आली होती, त्या धर्तीवर डिजिटल भारत ही घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. मोदी सत्तेवर येऊन सहा वर्षे झाली, परंतु संपूर्ण भारत डिजिटल झाला नाही. त्यामुळे विद्यार्थ्याना डिजिटल शिक्षण द्यावे कसे, असा प्रश्न घोषणाकर्ते व सर्वसामान्य लोकांसमोर उपस्थित झाला आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे राज्यातील शाळा दरवर्षीप्रमाणे १५ जूनला सुरू करणे शक्य झाले नाही. मात्र २०२०-२१चे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने घेतला. विद्यार्थ्यांना घरबसल्या शिकता येण्यासाठी संगणक, मोबाइल या साधनांसह दूरचित्रवाणी, रेडिओ या माध्यमांचा वापर करण्याचे ठरवण्यात आले,परंतु केंद्र सरकारचा अजूनही प्रतिसाद आलेला नाही. प्रधानमंत्री लवकरच दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवर विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची घोषणा करतील, अशी आशा आहे. राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षां गायकवाड यांनी केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांना पत्र लिहून दूरदर्शन आणि आकाशवाणीवर विद्यार्थ्यांच्या शिक्षणप्रसारासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. ही वेळ मिळाल्यास राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेने तयार केलेले शैक्षणिक साहित्य व्हच्र्युअल क्लासरूम यांचा वापर करता येईल, असे गायकवाड यांनी दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. मात्र अद्याप या मागणीला माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून प्रतिसाद देण्यात आलेला नाही. शालेय शिक्षण मंत्री ना.गायकवाड यांनी म्हटले आहे की, यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र आणि दूरध्वनीद्वारे केंद्र सरकार व प्रसारण मंत्रालयाशी संवाद साधला आहे. दूरदर्शन आणि आकाशवाणी उपलब्ध झाल्यास राज्यातील सर्व विद्यार्थ्यांपर्यंत एकाचवेळी पोहोचणे शक्य होईल. तसेच जिओ आणि टाटा स्काय यांच्याकडून वाहिनी उपलब्ध करून देण्याबाबत तयारी दर्शवण्यात आली आहे. शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणतात की, केंद्र सराक्राची परवानगी मिळाली नाही तर खासगी पुरवठादारांकडून विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याची व्यवस्था करावी लागेल. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागासमोर एकाच वेळी राज्यभरातील विद्यार्थ्यांना अध्यापन करण्यात समस्या निर्माण झाली आहे. संगणक, स्मार्टफोन इंटरनेट आदी सुविधा नसलेल्या शहरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्यासाठी सोपा उपाय म्हणजे दूरदर्शन व आकाशवाणीवर शिक्षणप्रसारासाठी केंद्र सरकारने वेळ उपलब्ध करून द्यावा. विद्यार्थ्यांना याचा निश्चित फायदा होईल आणि शैक्षणिक वर्ष वाया जाणार नाही.

गुरुवार, ४ जून, २०२०

गर्भवती हत्तीणीची हत्या : मानवी विकृतीचा बळी

गर्भवती हत्तीणीची हत्या : मानवी विकृतीचा बळी

 अशोक सुतार / ८६००३१६७९८

blogger/ Ashok Sutar
blogger/ Ashok Sutar

मनुष्य जंगलात अतिक्रमण करत आहे. साहजिकच वन्यप्राण्यांचे वसतीस्थान असलेल्या भागात वन्यप्राणी फिरतात, परंतु मानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतील. कारण मानवामध्ये निसर्गाबद्दल, वन्यप्राण्यांबद्दल सहानुभूती राहिलेली नसून विकृती निर्माण झाली आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण मानवी विकृतेची बळी ठरली, हीच मोठी खंत आहे.

         केरळमध्ये जिल्ह्यात मल्लपुरम येथील स्थानिक गावकऱ्यांनी एका गरोदर हत्तीणीला फटाक्यांनी भरलेले अननस फळ खायला देऊन निर्दयीपणे हत्या केल्याप्रकरणी वन्यप्रेमींमध्ये संताप व्यक्त होत आहे. याबद्दल नेक दिग्गज मंडळीनी खंत आणि निषेध नोंदवला आहे. आपण मानून म्हणून शिल्लक राहिलो आहोत का, अशी शंका आता मानवजातीबद्दल येऊ लागली आहे. आम्ही मानवता विसरून पशुत्वाकडे वाटचाल करत आहोत, असे दिसते. ज्या क्रूर पद्धतीने त्या हत्तीणीला संपवण्यात आले, ते पाहता हे निर्दयी कृत्य करणाऱ्यांना कडक शिक्षा होणे गरजेचे आहे. २७ मे रोजी घडलेली ही घटना केरळमधील वन-अधिकाऱ्याच्या फेसबूक पोस्टमुळे समोर आली. ही बातमी प्रसारमाध्यमांमध्ये आल्यानंतर हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेनंतर केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. ही घटना घडली असतानाच अशीच अजून एक घटना समोर आली आहे.एप्रिल महिन्यात कोल्लम जिल्ह्यातील पथनपुरम जंगल क्षेत्रात एका हत्तीणीचा अशाच पद्धतीने मृत्यू झाला होता. जंगल क्षेत्रापासून काही अंतरावर हत्तीण गंभीर अवस्थेत आढळली होती. एका महिन्यापूर्वी एका तरुण हत्तीणीचा मृत्यू झाला होता. यावेळी तिच्या तोंडात जखमा झाल्याचे समोर आले होते. केरळमध्ये यापूर्वी अशा अनेक घटना घडल्या असाव्या, असे दिसते. मानवाने जंगल क्षेत्रात अतिक्रमण केले असून जंगली प्राण्यांना नष्ट करणे सुरु केले आहे. मानवाच्या या क्रूरतेमुळे जंगलातील प्राण्यांचा अधिवास नष्ट होण्याची भीती आहे. जैविक अधिवास नष्ट होणे हे तेथील पर्यावरणाला बाधीकारक असते. त्यामुळे अशा अमानवी कृत्यांबद्दल संबंधिताना गंभीर शिक्षा होणे गरजेचे आहे. अनेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारनेही आता या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. मारेकरी सापडतीलाही, परंतु ही सैतानी वृत्ती थांबली पाहिजे, अन्यथा वन्यप्राणी अस्तित्वात राहणार नाहीत.                  केरळच्या मल्लपूरम जिल्ह्यात स्थानिकांनी गर्भवती हत्तीणीला फटाक्यांनी भरलेला अननस खायला दिला. हा अननस पोटात फुटल्यामुळे या हत्तीणीचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली आहे. फटक्यांनी भरलेले अननस खाल्ल्यानंतर ते हत्तीणीच्या पोटात फुटले. हा स्फोट इतका मोठा होता की, हत्तीणीच्या जीभ आणि तोंडाला गंभीर दुखापत झाली होती. या वेदना आणि भूक सहन होत नसल्यामुळे हत्तीण गावांमधून सैरावैरा पळत होती. या वेदनेमुळे तिला काहीही खाता येत नव्हते. अशाही परिस्थितीत तिने कुणाला इजा केली नाही. मला तरी ती एखाद्या देवीप्रमाणेच वाटली, अशी प्रतिक्रिया  मोहन कृष्णन  यांनी मल्याळम भाषेत आपल्या फेसबूक अकाऊंटवर मांडली आहे. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिले असण्याची शक्यता मोहन कृष्णन यांनी व्यक्त केली आहे. एका गर्भवती हत्तीणीची निर्दयीपणे हत्या झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त होत आहे. भुकेने व्याकूळ असल्याने ही हत्तीण मानवी भागात अन्नाच्या शोधात आली होती. यावेळी तिला फटाक्यांनी भरलेले अननस खायला घालण्यात आले. तीन दिवस ही असहाय्य हत्तीण पाण्यात मृत्यूची वाट पाहत उभी होती. वनविभागाच्या अधिकाऱ्यांना फेसबुक पोस्टवरून समजल्यानंतर जाग आली आणि घटनास्थळी पोहोचून त्या मृत हत्तीणीला इतर हत्तींच्या साहायाने बाहेर काढण्यात आले. वन अधिकाऱ्यांना संशय आहे की, हत्तीणीने फटाक्यांनी भरलेले अन्न खाल्याचा संशय आहे. तिच्या तोंडात त्याचा स्फोट झाला. वन अधिकारी आता शवविच्छेदन अहवालाची वाट पाहत आहेत. अशा घटनांचा तपास करणे कठीण असल्याचे वन अधिकारी म्हणत आहेत. अशा घटनांमध्ये पुराव्याची माहिती गोळा करणे कठीण काम असून जंगली हत्ती एका दिवसात अनेक किमी प्रवास करत असल्याने त्यांनी नेमके कुठे खाल्ले असावे किंवा घटना कुठे घडली असावी, याचा अंदाज येत नाही. कळपातून बाहेर आलेले हत्ती जखमी किंवा आजारी अवस्थेत सापडल्यानंतर वन विभागाला याची माहिती मिळते. यादरम्यान अनेक आठवडे उलटलेले असल्याने तपास खूपच आव्हानात्मक असतो,असे  वन अधिकारी म्हणत आहेत. परंतु घडलेली घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे.फटाके खायला देऊन हत्या करणे, ही आपल्या देशाची संस्कृती नाही. ही मानवी विकृती बंद केव्हा होणार ? प्राण्यांविषयी लोकांना अजूनही सहानुभूती नाही, हीच एक मोठी खंत आहे.             केरळमध्ये हत्तीणीच्या झालेल्या हत्येची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. घटनेची सखोल चौकशी करुन दोषींना ताब्यात घेतले जाईल व कठोर कारवाई केली जाईल, असे केंद्रीय वनमंत्री  पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटले आहे. केरळ वन-विभागाने हत्तीणीच्या मारेकऱ्यांचा शोध सुरु केला आहे. तर, प्राण्यांसाठी काम करणाऱ्या ह्यूमन सोसायटी इंटनॅशनल इंडियाने (HSI) या घटनेसाठी दोषी असणाऱ्यांची माहिती देणाऱ्याला ५० हजार रुपये बक्षिस देण्याची घोषणा केली आहे. याशिवाय हत्तीणीच्या मृत्यूसाठी जे जबाबदार असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, अशी माहिती केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी दिली आहे. केरळमध्ये स्थानिक शेतकरी रानडुकरांपासून शेताचे संरक्षण व्हावे यासाठी फटाक्यांनी भरलेल्या अननसाचा वापर करतात. हत्तीण अन्नाच्या शोधात जंगल सोडून जवळील गावात शिरली होती. याचदरम्यान हत्तीणीने हे फळ खाल्ले असण्याची शक्यता वन-अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. केरळमधील वन-विभागात काम करणारे अधिकारी मोहन कृष्णन यांच्या फेसबुक पोस्टमुळे ही घटना प्रसारमाध्यमांसमोर आली. स्थानिक लोकांनी तिला हे फळ खायला दिले असेल, असा अंदाज मोहन कृष्णन यांनी व्यक्त केला आहे. फळाचा स्फोट झाल्यानंतर, काही वेळाने ही हत्तीण वेलियार नदीच्या किनारी पोहचली आणि ती पाण्यात जाऊन उभी राहिली. मोहन क्रिश्नन यांच्या मते, जखमेवर माशा किंवा इतर किटक बसू नयेत यासाठी हत्तीणीने आपली सोंड पाण्यात बुडवली होती. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी स्थानिक वन अधिकाऱ्यांनी दोन जलदकृती टीम मागवल्या होत्या. मोहन याच टीमचे सदस्य होते. या हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी वन अधिकाऱ्यांनी इतर दोन हत्तींना घटनास्थळावर आणले, पण या हत्तीणीने बाहेर न येणे पसंत केले. वन अधिकाऱ्यांनी हत्तीणीला बाहेर काढण्यासाठी अथक प्रयत्न केले. परंतु मानवावरील भरवसा उडालेल्या हत्तीणीने आपले प्राण नदीत सोडले. मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर ही हत्तीण गर्भवती होती, असे लक्षात आले. अलीकडच्या काही वर्षांत माणूस आणि वन्यप्राण्यांचा संघर्ष सुरु आहे. परंतु याला नेमका संघर्ष म्हणता येणार नाही. कारण मनुष्य जंगलात अतिक्रमण करत आहे. साहजिकच वन्यप्राण्यांचे वसतीस्थान असलेल्या भागात वन्यप्राणी फिरतात, परंतु मानवाला वन्यप्राण्यांच्या अस्तित्वाची अडचण होऊ लागली आहे. काही महिन्यांपूर्वी गोवा राज्यातील म्हादई जंगलात चार पट्टेधारी वाघांचा विषबाधेमुळे मृत्यू झाला होता. खरे तर जंगलाच्या परिसरात राहणाऱ्या लोकांना पर्यायी जागा देऊन सरकारने त्यांचे पुनर्वसन न केल्यास अशा प्रकारच्या घटना सातत्याने घडतील. कारण मानवामध्ये निसर्गाबद्दल, वन्यप्राण्यांबद्दल सहानुभूती राहिलेली नसून विकृती निर्माण झाली आहे. केरळमधील गर्भवती हत्तीण मानवी विकृतेची बळी ठरली, हीच मोठी खंत आहे.

लढवय्ये बाबा

लढवय्ये बाबा